Saturday, May 24, 2008

तुझी त-हा

नसतानाही असण्याची तुझी त-हाच आगळी,
भुलले मी सख्या अशी..तुझी ओढ वेगळी

नसतोस ना तू पहाटेच्या गारव्यात..
तरी शिरशिरी कशी येते अंगात..

नी असतोस का तू पहाटेच्या लालीत..
भेटतोस निसर्गात..पाना-फुला-वेलीत...

तुच घोंघावतोस ना माझ्या कानी.....
वा-याच्या जोडीला तुझीच गाणी...

लपाछपी खेळताना गंमतच करतोस..
सापडतच नाहिस मला..का अस्सं छळतोस..

परवा ते फूलपाखरू परत हाती विसावलं
सोडून तुझे रंग बोटावर उगाचच स्थिरावलं.

जेव्हा येतात मेघ दाटून... पाऊस गर्दी करतो..
भिजवायला मला चिंब.. कोण सरीतून येतो..

निद्राधीन होताना.. थकून जरा पडताना...
कळतं मला डोक्यावरून मायेचा हात फिरताना..

अशा माझ्या वेड्या प्रश्नांना उत्तरं मिळत जातात..
जेव्हा कळतं.... तू नाही तुझ्या आठवणी मजसवे राहतात..

--स्नेहा

भांडी

माणसाचे पण असेच असते ना...
ह्या भांड्यांसारखं...
नविन असल्यावर भांडे मस्त चकचकीत..
एकदम आरश्याप्रमाणे पारदर्शी...
त्याच्यासमोर येणा-या प्रत्येकाला त्याची छबी दाखवणारे..
मग दाखवताना दिसेनात का कमतरता....
चेह-यातल्या,....अंतरंगातल्या..
त्या व्यक्तीला अवगत असलेल्या... काही अनावगत ....

जसजसं भांडं जुनं होतं.....
त्याच्यामधे बरंच अघळ-पघळ ठेवलं जातं....
कधी काही चमचमित ..कधी सात्विक...
कधी गोड, कधी तिखट.....
प्रत्येक दिवसागणिक भांड्याची चकाकी कमी होते...
आणि पारदर्शकता ही....
मग ते भांडंही लपतं .... पुसटश्या रंगाखाली....
आता मात्र ते पण घाबरतं..दाखवायला छबी..
शिकतं जगायला असेच उष्ट्या-खरकट्यात...

मग कधी काळ ही असा येतो की,
भांड्याला भिरकावलं जातं...पोक येई पर्यंत..
मलूल अश्या भांड्यावर घातले जातात,
हातोड्याचे घाव...पोक काढण्यासाठी...
अशावेळी.....कितीही घासलं तरी चकाकी येत नाही..
संपला ना रे काळ त्या भांड्याचा.. आता नष्ट व्हायच्या वाटेवर..

बघणार कोण त्याच्याकडे?......
लोकांनी नविन भांडी घेतली आहेत ना....

--स्नेहा